ग्राफिक्स चे क्रेडीट: लोकसत्ता टीम
खरं म्हणजे तुम्ही शिकल्यामुळेच ही नोकरी मिळालीय. मग कार्यालयात वापरण्यासाठी ‘शिकण्याचे कौशल्य’ ही काय नवीन भानगड? असा प्रश्न नक्कीच पडला असेल ना? आतापर्यंत शाळेत / महाविद्यालयात तुम्ही शिकलात. तिथे एक ठरावीक अभ्यासक्रम होता, त्याप्रमाणे अभ्यास केला, परीक्षा दिल्या व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात. पण आता कार्यालयात असा ठरावीक अभ्यासक्रम नाही व विद्यापीठाच्या परीक्षाही नाहीत. पण तुम्ही काय शिकलात आणि आत्मसात केलेत ह्याची परीक्षा सतत घेतली जाते, कधी तुम्हाला सांगून आणि कधी न सांगता! या परीक्षेच्या निकालाचे प्रमाणपत्र मिळते ते पगारवाढ किंवा बढती या स्वरूपात! त्यामुळे आपल्या कामाला आवश्यक असणारी कौशल्ये आपण किती त्वरित शिकतो व ती आपले काम करण्यासाठी किती प्रभावीपणे अमलात आणतो यावरच आपले या कार्यालयातील यश व अस्तित्व अवलंबून आहे.
ही कौशल्ये कोणती?
आपले काम कार्यक्षमतेने होण्यासाठी तांत्रिक कौशल्ये तुमच्याकडे असतीलच. उदा. संगणकसाक्षरता, टंकलेखनावरील प्रभुत्व, अचूक जमाखर्च ठेवणे किंवा तुम्ही उत्पादन खात्यात काम करीत असाल तर अभियांत्रिकी संबंधित कौशल्ये, वगैरे. पण याव्यतिरिक्त अतिशय सामान्य कौशल्ये प्रत्येकाकडे असणे हे आवश्यक आहे. जसे, दूरध्वनीवर उत्तम संभाषण करणे, गटचर्चेत सक्रिय भाग घेणे, आपला मुद्दा आक्रमतेने नाही तर ठासून पटवून देणे, कामात पुढाकार घेणे, मतभेद झाले तरी सगळ्यांशी सौहार्दपूर्ण संबंधांचे जतन करणे, कठीण प्रसंगात गोंधळून न जाता मार्ग काढणे, इत्यादी.
नोकरीतील पहिल्या वर्षी कमीत कमी वेळात हे सर्व ‘शिकण्याचे’ आव्हान तुमच्यापुढे आहे. तेव्हा हे शिकण्याचे कौशल्य कसे आत्मसात करता येईल ते बघू या. या नवीन नोकरीत तुम्ही अगदी नवशिके आहात आणि तुम्हाला व्हायचेय तज्ज्ञ, तर मग पुढील आलेख बघा. कुठल्याही ज्ञानग्रहणाचे आठ टप्पे असतात; ते जेवढे लवकर तुम्ही अंगी बाणवाल तेवढे लवकर तुम्ही नवीन ज्ञान ग्रहण करू शकाल व तुमचे काम जास्तीत जास्त कार्यक्षमतेने व भरभर करू शकाल.
१. तुम्ही नवशिके आहात : हे सत्य स्वीकारणे हाच पहिला टप्पा आहे. मनाची पाटी कुठल्याही प्रकारे पूर्वग्रहदूषित नको. मला हे येतेच आहे, त्यात काय शिकायचे, यापेक्षा कार्यालयातील सर्वात कार्यक्षम सहकारी हे काम कसे करतो याचे निरीक्षण करा.
२. ज्ञान : तुम्हाला दिलेले काम करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ते सर्व ज्ञान पुरेशा प्रमाणात आहे की नाही याची पुन्हा पुन्हा खात्री करा. नसल्यास जेथून कुठून ते मिळेल तेथून ते मिळवा.
३. ज्ञानाचे आकलन : आता ज्ञान तर मिळाले, पण ते पूर्णत: समजून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एकच मार्ग असतो, तो म्हणजे ज्ञानाची परत परत उजळणी.
४. ज्ञानाचा वापर : हा पुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. वरच्या टप्प्यात आकलन करून आत्मसात केलेले ज्ञान आता प्रत्यक्ष वापरून बघा. एकदा नाही तर अनेकदा. तुमच्या लक्षात येईल की दर वेळेला ज्ञानाचा वापर तुम्ही नव्या कार्यक्षमतेने व नव्या आत्मविश्वासाने करता आहात.
५. वापरण्याच्या अनुभवाचे पृथ्थकरण : आत्मसात केलेले ज्ञान चौथ्या टप्प्यात वापरतानाच तुमच्या लक्षात आले असेल की, आपण दर वेळेला काही तरी वेगळे करतो आहोत. ते ज्ञान वापरून काम करावयाची तुमची क्षमता वाढते आहे. असे कसे होते याचे मनोमन पृथ्थकरण करा. होणाऱ्या चुका शोधा.
६. पृथ्थकरणावरून ज्ञानाची पुनर्बाधणी : चौथ्या व पाचव्या टप्प्यात झालेल्या बोधावरून दुस-या व तिस-या टप्प्यातील मिळालेल्या ज्ञानाची अशा रीतीने चपखल पुनर्बाधणी करा की पुढे जेव्हा जेव्हा हे ज्ञान वापरायची वेळ येईल तेव्हा तुम्ही ते सर्वोच्च कार्यक्षमतेनेच वापराल आणि त्यात सर्वोत्तम यश मिळवाल.
७. मूल्यमापन : आता या प्रक्रियेने मिळवलेल्या ज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या कामाचे तुम्ही स्वत: मूल्यमापन करा. तसेच निरपेक्ष असणा-या इतर एक-दोन सहका-यांकडून मूल्यमापन करून घ्या. बघा त्यांचे मत काय होते ते.
८. तुम्ही तज्ज्ञ झालात : जर तुम्ही ज्ञान ग्रहणाची ही प्रक्रिया प्रामाणिकपणे अंगी बाणवलीत तर कामाशी निगडित कुठलीही कौशल्ये तुम्ही लीलया आत्मसात कराल व त्यात तरबेज व्हाल; अर्थातच मग पगारवाढीपासून किंवा बढतीपासून आता तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही!
तुमच्या वरिष्ठ पदावरील सहका-यांच्या यशाचे गमक हेच आहे. तुमच्या भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीमध्येसुद्धा हे शिकण्याचे कौशल्य एक फार मोठी कामगिरी करणार आहे, हे नक्की!
वरील लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा काही प्रतिसाद द्यावयाचा असल्यास मला jayantpanse.blog@gmail.com ह्या इमेल आयडी वर मेल पाठवा. मी लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.
© डॉ. जयंत पानसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा